एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
एटापल्ली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : एटापल्ली तालुक्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रातील सूरजागड परिसरात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला आहे. त्यामुळे या भागात वाघाचा वावर असल्याची चर्चा अखेर प्रत्यक्ष पुराव्याने स्पष्ट झाली आहे. याच ट्रॅप कॅमेऱ्यात तडस याचीही नोंद झाली आहे.
मागील आठवड्यात कसनसूर वनपरिक्षेत्रात सलग चार पशुहल्ल्यांच्या घटना घडल्यानंतर परिसरात वाघाच्या हालचालींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर वन विभागाने निरीक्षणासाठी ट्रॅप कॅमेरे बसविले. या कॅमेऱ्यात वाघाची स्पष्ट नोंद झाल्याने परिसरात वाघाचा वावर असल्याची पुष्टी झाली आहे. येलचील, चंद्राखंडी, सूरजागड तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांनी यापूर्वीही वाघ दिसल्याचा दावा केला होता. मात्र, प्रथमच ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाल्याने स्थानिकांच्या निरीक्षणाला वन विभागाकडूनही दुजोरा मिळाला आहे. यामुळे पुढील निरीक्षणासाठी महत्त्वाचा आधार उपलब्ध झाला आहे. सध्या या परिसरातील वाघाचा वावर कायमस्वरूपी आहे की तो केवळ स्थलांतरित आहे, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. यासाठी वन विभाग पुढील काही दिवस अधिक बारकाईने निरीक्षण करणार असून, अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे आणि गस्तीद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. सलग पशुहल्ले आणि ट्रॅप कॅमेऱ्यातील नोंद लक्षात घेता वन विभागाने नागरिकांना जंगलालगतच्या भागात वावरताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सकाळी लवकर व संध्याकाळच्या वेळी जंगलात किंवा जंगलालगत एकट्याने जाणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे.
“या भागात वाघाचे स्थायी अस्तित्व असल्याबाबत अद्याप कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. ट्रॅप कॅमेऱ्यात दिसलेला वाघ हा स्थलांतरित असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. वन विभाग संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.”
— शैलेश मीना, उपवनसंरक्षक, भामरागड वनविभाग

संघर्षाला अखेर यश; सेवारीचा ग्रामसेवक निलंबित, आता जारावंडीच्या चौकशीची मागणी – InfoNewsUpdate24
