एटापल्ली | प्रतिनिधी | InfoNewsUpdate24
एटापल्ली (प्रतिनिधी) दि. १९ जुलै : एटापल्ली तालुक्यातील दोड्डी गावात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून सर्वत्र खड्डे पडल्याने नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना व रुग्णांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय गावातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील बेवारस झाली असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पावसाळ्यात रस्त्यांमध्ये पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे दोड्डी गावातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून पिण्याच्या पाण्याची नियमित व सुरळीत व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
आता प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणार का, असा प्रश्न दोड्डी गावातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

