५ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान राज्यभर विशेष अभियान; मानसिक आरोग्यासाठी ‘मानस’ पुस्तिकेचेही प्रकाशन
मुंबई | प्रतिनिधी | Info News Update 24
मुंबई , दि. २० जुलै : राज्यातील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात तसेच बालकांना त्यांच्या हक्क व अधिकारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली.
महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून ५ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागात विशेष अभियानाच्या स्वरूपात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे बालकांना त्यांच्या हक्क, अधिकार आणि संरक्षणासाठी उपलब्ध असलेल्या विविध यंत्रणांची माहिती देण्यात येईल. तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत राज्य बाल हक्क आयोगामार्फत बालकांच्या मानसिक आरोग्य, मूल्यसंस्कार आणि जीवनकौशल्य विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मानस’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याशिवाय पालघर जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या ‘मानस’ प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मानसिक आरोग्य कीटचे उद्घाटनही मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री तटकरे यांनी सांगितले की, बालकांना सुरक्षित, सशक्त आणि सक्षम वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध स्तरांवर काम करत असून, नव्या अभियानामुळे बालहक्कांविषयी जनजागृती वाढण्यास तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बालकेंद्रित विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.

- गडचिरोलीत टसर रेशीम विकास प्रकल्पाला गती; रेशीम संचालनालय आणि बाएफमध्ये सामंजस्य करार
- मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीतील ३४ दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्मार्ट व्हिजन’ उपकरणांचे वाटप
- काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये पक्षप्रवेश
- मिशन लक्षवेध अंतर्गत कुस्ती व रोईंग खेळाडूंसाठी निवड चाचणी; २२ व २४ जुलै रोजी पुण्यात आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान; २२ जुलै रोजी गडचिरोलीत मुख्य कार्यक्रम
