मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५,०२९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण
गडचिरोली | प्रतिनिधी | ७ ऑगस्ट
गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत १५ कोटी १८ लाख ७२ हजार ११८ रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी बँकांना प्राप्त झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राज्यस्तरीय कार्यक्रमात लाभाचे वितरण करण्यात आले.
राज्यात आजपर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख २२ हजार पात्र शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटी रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली आहे. शासनाने ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर जमा केली आहे. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील २,६७१ पात्र कर्जखात्यांसाठी १५.१८ कोटी रुपयांचा निधी संबंधित बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे.
खरीप पीक कर्ज तातडीने देण्याचे निर्देश
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बँकांना पात्र शेतकऱ्यांना तातडीने नवीन खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी आवश्यक आर्थिक मदत वेळेत मिळणार आहे.
आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन
योजनेच्या पहिल्या यादीत नाव असलेल्या, मात्र अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण न केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी ते तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळणार असून, कर्जमुक्तीनंतर तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध होणार असल्याने खरीप हंगामातील शेतीकामांनाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

