एटापल्ली | प्रतिनिधी | दि. ३१ ऑगस्ट २०२६
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात हालेवारा ते पिपली-बुर्गी मार्गावरील कोरणार नदीवरील पूल २९ जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित पुलाची निर्मिती अवघ्या चार ते पाच वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या पुलाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र, एवढ्या कमी कालावधीत आणि एका मुसळधार पावसानंतर पूल कोसळल्याने पुलाच्या बांधकामाचा दर्जा, गुणवत्ता आणि संबंधित यंत्रणांच्या कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
३१ जुलै रोजी नदीचे पाणी ओसरल्यानंतर पुलाचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान स्पष्टपणे दिसून आले. घटनास्थळी काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये पुलाचा मोठा भाग वाहून गेल्याचे आणि संरचनेची मोठी हानी झाल्याचे दिसून येते.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पुलाच्या बांधकामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी, गुणवत्तेचे स्वतंत्र परीक्षण आणि दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, कंत्राटदार व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पर्यायी मार्गाची तातडीने व्यवस्था करून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. चौकशीचा अहवाल आल्यानंतरच पूल कोसळण्यामागील वास्तविक कारण स्पष्ट होणार आहे.

