गडचिरोली | प्रतिनिधी | Info News Update 24
गडचिरोली, दि. २३ जुलै : धान रोवणीच्या हंगामात पावसात, चिखलात आणि प्रतिकूल हवामानात दिवसभर मेहनत करणाऱ्या शेतमजुरांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांनी एक संवेदनशील सामाजिक उपक्रम राबविला. त्यांच्या हस्ते धान रोवणी करणाऱ्या शेतमजुरांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
पावसाळ्यात सतत पाण्यात व चिखलात काम करणाऱ्या शेतमजुरांना सर्दी, ताप व इतर आजारांचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन थेट शेतात जाऊन रेनकोटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे मजुरांना पावसापासून संरक्षण मिळणार असून त्यांचे काम अधिक सुरक्षित व सुलभ होण्यास मदत होणार आहे.
यावेळी शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांनी सांगितले की, “शेतमजूर हे शेतीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या श्रमामुळेच शेती बहरते. त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे.”
या उपक्रमामुळे शेतमजुरांनी आनंद व्यक्त करत शितलताई व भोलूभाऊ सोमनानी यांचे आभार मानले. तसेच स्थानिक नागरिक व शेती क्षेत्रातील जाणकारांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा लोकाभिमुख उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
“शेतमजुरांचा सन्मान – समृद्ध शेतीचा पाया” हा संदेश देत राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजात सकारात्मक प्रेरणा निर्माण करणारा ठरत आहे.

Official Website: www.infonewsupdate24.com
