एटापल्ली | प्रतिनिधी | Info News Update 24
एटापल्ली, दि. २२ जुलै : एटापल्ली तालुक्यापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या एकरा बु. गावाजवळील नाला सततच्या पावसामुळे तुडुंब भरला असून, पूल किंवा पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
पावसाळ्यात या नाल्यावरील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे दररोज शालेय विद्यार्थी, महिला, शेतकरी तसेच अत्यावश्यक कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना भरलेल्या नाल्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असूनही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने नागरिकांना जीवाची बाजी लावून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी पूल उभारण्याची किंवा पर्यायी सुरक्षित रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, अद्याप या गंभीर समस्येकडे दुर्लक्षच करण्यात आले असून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, “एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने या ठिकाणी कायमस्वरूपी पूल उभारण्याची किंवा सुरक्षित पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

- एटापल्ली तालुक्यात झाड कोसळल्याने रस्ता बंद; रुग्णवाहिका अडकली, तातडीने कारवाईची मागणी
- एटापल्लीपासून अवघ्या ४ किमीवर एकरा बु. गावातील नाल्याचा जीवघेणा प्रवास; नागरिक जीव धोक्यात घालून करत आहेत ये-जा
- डॉ. धर्मराव बाबा आत्राम : ‘समाधान शिबिर’ म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही; स्कूल बस सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांचे कडक निर्देश
- शेतकऱ्यांनी तातडीने Farmer ID नोंदणी करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
